बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय
         Date: 05-Mar-2019
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय
भारत- पाकिस्तान सैनिकी तणाव आणि पाकिस्तानच्या वांशिक स्वातंत्र्य आंदोलनांचे विश्लेषण

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान सैनिकी तणावाचा आणि या तणावाचे पाकिस्तानवर होणारे संभाव्य आर्थिक, भौगोलिक, राजकीय आणि सैनिकी परिणाम यांचा थोडक्यात आढावा.
बालाकोट हवाई हल्ले
पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर खायबर पख्तुनख्वा प्रांतात असलेल्या बालाकोट या डोंगराळ भागात जैश-ए-मोहम्मद च्या आतन्कवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याने आशिया खंडातील सामरिक समीकरणे आमूलाग्र बदलली आहेत. १९७१ नंतर प्रथमच भारतीय लढाऊ विमाने नियंत्रण रेषा- LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानात दाखल झाली. कोणत्याही प्रकारच्या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्याला पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या भीतीने सैनिकी उत्तर नं देण्याचे भारताचे धोरण या हल्ल्यांनी मोडीत निघाले.
२०१६ ला उरी हल्ल्यानंतर भारतीय स्पेशल फोर्सेसनी LoC पार करून अतिरेकी तळांवर हल्ले केले पण त्यामुळे भारत पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून कारवाई करून शकतो ही भीती पाकिस्तानच्या मनात बसली, याव्यतिरिक्त आतंवादाचा बंदोबस्त यात झाला नाही. LoC पार एका कारवाईने आतंकवादाचा बंदोबस्त होईल असं मानणं हा शुद्ध भोळेपणाही होता. स्पेशल फोर्सेसच्या कारवाईने आयएसआय अतिरेकी ताल सतत हलवत राहिली आणि पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवा यांचे LoC चे दौरे मोठ्या प्रमाणात वाढले, जेणेकरून भारत सीमापार परत छापेमारी करू शकणार नाही.


 यापलीकडे जाऊन भारत पाकिस्तानी अतिरेकी संघटनांवर पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर हवाई हल्ले करेल ही शक्यता पाकिस्तानी सेने, आयएसआय आणि अतिरेकी संघटना यांनी कधीही विचारात घेतली नाही. त्यामुळेच बालाकोट हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी सेनेचा प्रवक्ता ले.जन. असिफ गफूर यांनी स्वतःच घोषित करून टाकलं कि भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत येऊन गेली आणि निर्जन जागी काही "पेलोड्स " टाकून पळाली! संध्याकाळी भारतीय विदेश सचिव विजय गोखले यांनी या कारवाईची अधिकृत माहिती जगाला दिली. यामुळे पाकिस्तानच्या आण्विक दहशतवादाची अखेर झाली. आण्विक शस्त्रांच्या आडोशाने आपण भारताला दबावात ठेऊ ही पाकिस्तानची कल्पना कायमसाठी मोडीत निघाली आहे.
बालाकोट नंतर जैश चं काय झालं ?
पाकिस्तानमधुन येणाऱ्या बातम्यांवरून असं सिद्ध होतंय कि बालाकोट हल्ल्यानंतर आयएसआय ने पाकिस्तानच्या पशातून बेल्टमधील ख्यबर पख्तुनख्वा आणि फाटा प्रदेशात हे सर्व शिल्लक अतिरेकी हलवले आहेत. या अतिरेक्यांना त्यांनी डुरंन्ड लाईनच्या जवळ असलेल्या पाकिस्तानी सेनेच्या वेगवेगळ्या तळांवर आणि किल्ल्यांवर लपवून ठेवलं आहे. याच प्रदेशात अफगाणिस्तान मधील तालिबान आणि इराण विरोधी सुन्नी अतिरेकी गट जैश उल अद्ल यांचे तळ आहेत. आणि इथुनच सोव्हिएट विरोधात अमेरिकेची सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी मुजाहिदीनांना प्रशिक्षण दिले होते. इथलं मिरानशाह हे शहर हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी ची जन्मस्थान आहे आणि मौलाना सामी उल हक (तालिबानचा पितामह) याने सुरु केलेल्या मदरसा हक्कानीया इथूनच चालतो.
पश्तुन यावेळी पाकिस्तानला मदत करतील?
१९४८ च्या पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धापासून कट्टर सुन्नी मुस्लिम असलेले पश्तुन हे पाकिस्तानी सैन्यसोबत सतत भारताविरोधात उभे राहिले आहेत. परंतु गेल्या एक वर्षात यात आमूलाग्र बदल झाला आहे. मंजूर अहमद पशतीन या युवा पश्तुन कार्यकर्त्याने नकिबुल्लाह मेहसूद नावाच्या युवा गायकाच्या हत्त्येनंतर पश्तुन तहफ्फुज मुव्हमेंट नावाची चळवळ सुरु केली. नकिबुल्लाह ह्या युवा पश्तुन गायकाला, बदनाम पोलीस अधिकारी राव अन्वर याने एका खोट्या चकमकीत अतिरेकी असल्याचा शिक्का मारून ठार मारले. त्यानंतर सुरु झालेली हि लोकशाही चळवळ पश्तुन प्रदेशात मोठा जनाधार मिळवत आहे. एकेकाळी हेच पश्तुन युवक अफगाणिस्तानमधील जिहाद मध्ये शहीद झालेल्या मुजाहिदीनांची शौर्य गीते गात होते परंतु आता त्यांच्या तोंडावर "दा संगा आझादी दा?" (हे स्वातंत्र्य काय कामाचं?) हे पीटीएम चं गीत आहे. कारण पाकिस्तानी सत्ता पंजाब्यांच्या हातात एकवटलेली आहे आणि त्यात बलूच, पश्तुन, मुहाजिर, सिंधी यांना काडीची किंमत नाही.
पश्तुन नेत्यांचा पाकिस्तानी सैन्याला ठेंगा!
यावेळी ही परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानी सैन्याने वझिरिस्तानमधील जानीखेल येथे पश्तुन ट्रायबल नेत्यांची एक बैठक बोलावून त्यांना भारत विरोधी युद्धात सैन्याला साथ देण्याची विनवणी केली. पण ही विनंती त्यांनी साफ साफ फेटाळून लावली. काही महिन्यांपुर्वी वझिरीस्तानमधील संसद सदस्य अली वझीर यांनी सोशल मीडियावर या भूमिकेचा जाहीर उच्चार केला होता. त्यांनी म्हटलं होतं, "पश्तुन्स यापुढे १९७१ ची चूक करणार नाहीत, सैन्याने पाठींबा गृहीत धरू नये!"
पाकिस्तानसोबत "अयुद्ध" हेच खरं युद्ध!
२००१ च्या संसद हल्ल्यानंतर भारताने सीमेवर सैन्याची प्रचंड मोठी तैनाती केली होती. जवळपास एक वर्ष दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या स्थितीत तैनात होते. या तैनातीत दोन्ही देशांचे अब्जावधी रुपये खर्च झाले. पुलवामा नंतरही अशाच प्रकारची सैन्य तैनाती दोन्ही बाजुंनी सुरु आहे. पण यावेळी त्यात थोडा फरक आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान यावेळी अत्यंत दुविधेमध्ये आहे, आणि यापुढे भारत काय कारवाई करेल याचा पाकिस्तानला अजूनही अंदाज आलेला नाही. पण एक गोष्ट पक्की आहे, कि भारत कोणतीही मोठी सैन्य कारवाई सध्या करणार नाही!
का?
सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन सैन्य सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.
भारताने सीमेवर केलेल्या आक्रमक सैन्य तैनातीमुळे पाकिस्तानला तशीच तैनाती करणं अत्यावश्यक आहे. यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अब्जावधी रुपये रोज जाळत आहे. भारतीय हल्ल्यांनी पाकिस्तानची प्रवासी आणि व्यापारी विमान वाहतूक गेला आठवडाभर पूर्णपणे बंद आहे. चीनसह अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाकिस्तानवरील विश्वास पूर्ण उडत चालला आहे.
अशीच सैन्य तैनाती दीर्घकाळ चालू ठेवावी लागली तर पाकिस्तानात महागाई कळस गाठेल आणि अंतर्गत अशांतता वाढत जाईल. एक वेळ अशी येईल कि सैन्यसुद्धा सामाजिक उद्रेक थांबवू शकणार नाही.
पाकिस्तानला युद्ध फायदेशीर ठरेल?
होय, प्रत्यक्ष युद्ध झाल्यास पाकिस्तानला ते फायदेशीर ठरेल. पाकिस्तानी सैन्य अधिकारी कोणत्याही भारत पाक युद्धाला धार्मिक रंग देण्यात कसूर ठेवत नाहीत. भारताची पाकिस्तानवर केली जाणारी सैन्य कारवाई पाकिस्तानला पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतील. अरब देशातील कट्टर वहाबी आणि सलाफी अब्जाधीश हिंदू भारताचं इस्लामिक पाकिस्तानवर आक्रमण परतवून लावण्यासाठी आपली तिजोरी पाकिस्तानवर उधळू शकतात. त्याशिवाय आशिया खंडात आपलं वर्चस्व सतःपित करण्यासाठी आतुर चीन, भारताविरोधात पाकिस्तानला मुबलक शस्त्र पुरवठा करू शकतो.
पाकिस्तानात सध्या पश्तुन लोकांमधील अस्वस्थता दाबण्यासाठी पाकिस्तान युद्धाचा खुबीने वापर करू शकतो. पराकोटीचे कट्टर सुन्नी मुस्लिम असलेले पश्तुन "अल्लाहू अकबर" च्या एका नाऱ्यावर पाकिस्तानी सेनेच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहू शकतात.
म्हणूनच एकही गोळी नं झाडात केलेलं युद्ध पाकिस्तानला नामोहरम करण्यासाठी पुरेसं आहे. अर्थात भारतालाही याची आर्थिक किंमत मोजावीच लागेल, पण प्रत्यक्ष युद्धापेक्ष टी कितीतरी कमी असेल आणि यात भारतीय सैनिकांची होणारी अपरिमित हानी वाचू शकेल.
हे "वॉर ऑफ ऍट्रीशन" स्वतंत्र बलुचिस्तान, सिंधुदेश आणि मुहाजिर राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून देईल.
भारताची सैन्य तैनाती सुरु झाल्या झाल्या पाकिस्तानने बलुचिस्तान आणि पश्तुन भागातून घाईघाईने सैन्याची हलवाहलव सुरु केली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तान आणि इराण सीमेवरून भारतीय सीमेवर नेलं जात आहे. यामुळे बलुच गटांचे पाकिस्तानी सैन्यावर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय सैन्याने रिकाम्या केलेल्या २०० च्या आसपास पाकिस्तानी चौक्या आणि ठाणी बलुच योद्ध्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. गेल्या एक महिन्यात बालुच हल्ल्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
एका वरिष्ठ बलुच कमांडरच्या म्हणण्यानुसार भारताची आक्रमक सैन्य तैनाती दीर्घकाळ पाकिस्तानी सीमेवर राहिल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला जाईल आणि बलुच , सिंधी, मुहाजिर स्वातंत्र्य आंदोलनाला यातून मोठं बाळ मिळेल.
बलुचिस्तान स्वातंत्र्यात इस्राएलची भूमिका
पुलवामा हल्ल्यानंतर भारताला सर्वात आधी आणि जाहीर समर्थन इस्राएल ने घोषित केलं. भारतीय विमानांनी इस्राएल निर्मित स्पाईस २००० हे स्मार्ट बॉम्ब बालकोट हवाई हल्ल्यात जैश विरुद्ध वापरले. शिवाय इस्राएलने भारताला बालाकोट हल्ल्यासाठी ताजी आणि अचूक गुप्तचर सूचना दिली असण्याची शक्यता खूप जास्त आहे. इस्राएलची इराणसोबत असलेली पराकोटीची शत्रुता स्वतंत्र बलुचिस्तान साठी एक मोठी संधी आहे. इराणची वैश्विक-इस्लामी महत्वाकांक्षा ठेचण्यासाठी अमेरिका, इस्राएल आणि सौदी सध्या एकत्र काम करत आहेत. आणि पाकिस्तान इराण संबंध सध्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे इराणला दाबण्यासाठी अगदी खेटून असलेला बलुचिस्तान स्वतंत्र देश असणं इस्राएल साठी सध्याची तात्काळ गरज आहे. इराणचा सीस्तान- बलुचिस्तान प्रांत बलुचिस्तानचा भाग असल्याचा बलुची दावा करतात आणि इराणी सत्ता बलुच लोकांवर अत्याचार करत असते. याचा फायदा उठवून इस्राएल स्वतंत्र बलुचिस्तान साठी आपली शक्ती लावेल किंवा सध्या लावत आहे असं मानायला भरपूर जागा आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाने बलुचिस्तान साठी ही अद्वितीय संधी दरवाजात आणुन ठेवली आहे.
भारत-पाकिस्तान तणावात चीनची भूमिका काय असेल?
चीनने पाकिस्तानात CPEC अंतर्गत ७६ अब्ज डॉलर्सची अवाढव्य गुंतवणुक केली आहे. बलुचिस्तान मधील ग्वादर बंदर चीनने आपल्या ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्याचं काम जोरात सुरु आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील अनेक खाणी उत्खननासाठी चीनच्या ताब्यात आहेत. चीन पंजाबी पाकिस्तानशी हातमिळवणी करून आमची साधनसंपत्ती लुटत आहे असा बलुच नेत्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे सर्व प्रमुख बलुच सशस्त्र संघटना चीनच्या प्रकल्पांवर सतत हल्ले करत असतात. विद्रोही नेते डॉ. अल्लाह नजर बलुच आणि दिवंगत नेता उस्ताद अस्लम चीनला बलुचिस्तान सोडुन जाण्याबद्दल सतत इशारे देत असतात. काही महिन्यांपूर्वी उस्ताद अस्लमने आपला मुलगा रेहान याला एका चिनी कंपनीच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यासाठी पाठवुन त्याचा व्हिडीओ त्यांनी प्रकाशित केला होता.
कराचीच्या चिनी दुतावासावर ३ बलुच विद्रोह्यांनी हल्ला केल्यानंतर उस्ताद अस्लमने एक मोठा व्हिडीओ प्रकाशित करून चीनला परत इशारा दिला होता कि त्यांनी तात्काळ बलुचिस्तानची लूट थांबवावी.
अशा परिस्थितीत चीन आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणुक सुरक्षित राखण्यासाठी पाकिस्तानच्या विभाजनाला मूक संमती देईल का? का वाटेल त्या स्थितीत तो पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील? पाकिस्तानच्या सोबत उभा राहून चीन मलाक्का स्ट्रेट मधून होणारी स्वतःची क्रूड ऑइल वाहतूक धोक्यात घालून घेईल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत आणि याची उत्तरे येणार काळ देऊ शकेल.
निष्कर्ष
अनेक विरोधाभासांनी भरलेले आणि सतत वांशिक हिंसाचाराने व्यापलेले पाकिस्तान ही एक अस्थायी राजकीय व्यवस्था होती. १९४७ मध्ये ब्रिटिशांच्या भूराजकीय गरज भागवण्यासाठी "पाकिस्तान" नावाची हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. सध्याच्या वैश्विक राजकारणात ती पूर्वीएवढी प्रासंगिक आणि उपयुक्त राहिलेली नाही. १९७१ ला तिचं पाहिलं विभाजन झालं आणि आता अजून ३ विभाजने होण्याच्या मार्गावर आहेत.
म्हणून....
भारताने सध्याच्या स्थितीत मोठा सैनिक संघर्ष स्वतःहून सुरु नं करता, आणि सध्याची आक्रमक सैनिकी तैनाती जराही कमी नं करता पाकिस्तानवर जीवघेणा सैनिकी दबाव कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानी अर्थव्यवस्था धाराशायी होईल आणि बलुच, पश्तुन, सिंधी, मुहाजिर ही वांशिक राष्ट्रवादी आंदोलने जोमाने मन वर काढू शकतील.
अफगाणिस्तानातील रक्तरंजित तालिबान आतंकवाद आणि कश्मीर मधील रक्तपात याची मुळे पाकिस्तानात खोलवर रुजलेली आहेत त्यामुळे पाकीस्तान पूर्णपणे खंडीत केल्याशिवाय यावर कोणताही उपाय नाही. पुलवामाच्या दुर्दैवी घटनेने आपल्याला हेच कटु सत्य परत एकदा सांगितलं आहे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची संधीही दिली आहे. आपण त्यादिशेने पुढे जात आहोत असंच सध्या दृश्य आहे.
---विनय जोशी