चर्च वरील हल्ल्यानंतर श्रीलंकेत होणार होता बुद्ध मंदिरांवर हल्ला. पुन्हा एकदा भारताने केले अलर्ट.
         Date: 16-Jul-2019

चर्च वरील हल्ल्यानंतर श्रीलंकेत होणार होता बुद्ध मंदिरांवर हल्ला. पुन्हा एकदा भारताने केले अलर्ट.

 

ईस्टर संडे च्या दिवशी झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेली इस्लामवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) चे धागेदोरे भारतात सापडले. या स्फोटाला दोन महिने होत नाहीत तोवर या संघटनेची  श्रीलंकेतील बौद्ध मंदिरांवर हल्ला करण्याची योजना होती. 

 

ईस्टर संडे च्या हल्ल्यानंतर दोन दिवसातच भारतीय गुप्तचर खात्याने श्रीलंकेला एनटीजे कडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्याची चेतावणी दिली होती.

 

१९ एप्रिल रोजी, म्हणजेच ईस्टर बॉम्ब हल्ल्याच्या दोन दिवस आधी एनटीजेचा संस्थापक जहरान याने  आपले रिलवान आणि झैनी हे दोन भाऊ आणि अनेक दहशतवादी महिलांसह गिरिऊला येथील दुकानातून २९००० रुपयांची पांढऱ्या कापडाची खरेदी केली होती.

 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही खरेदी बुद्ध मंदिरावरील हल्ल्याची होती. या बौद्ध मंदिरात गौतम बुद्धाचा दात जपून ठेवलेला असल्याने समस्त बौद्ध धर्मियांना खूप पवित्र असं हे प्रार्थनास्थळ आहे. श्रीलंकेत अजून दोन वेळा बॉम्बस्फोट करण्याचा या दहशतवादी संघटनेचा डाव होता. त्यात हे मंदिर पहिल्या स्थानावर होते. या हल्ल्यासाठी ११ आत्मघातकी बॉम्बर्सना प्रशिक्षित केले गेले होते. ज्यांना ही संघटना फिदायीन म्हणते. 

 

 

ईस्टर हल्ल्यासाठी बनविण्यात आलेल्या स्फोटकांमधील उरलेली स्फोटके दहशतवाद्यांनी नेगोम्बो आणि सम्मानथुराई मधील गोदामातून दुसऱ्या हल्ल्यासाठी पाठविली. दुसऱ्या हल्ल्याची जबाबदारी रिलवान याच्यावर होती. त्याला या दुसऱ्या हल्ल्याचा सूत्रधार बनविले गेले. ही स्फोटके एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जो ट्रक होता त्या ट्रकसाठी ड्राइवर मात्र त्यांच्याकडे नव्हता. ड्रायव्हरची सोय त्यांना बाहेरून करावी लागली.

 

"मी जेव्हा त्यांना विचारले की हे एवढे वजनदार का आहे? तेव्हा ते म्हणाले की त्या कॅन मध्ये सोन्याचे दागिने बनविण्यासाठी वापरले जाणारे सल्फ्युरिक ऍसिड आहे. कुणालाही संशय येणार नाही असेच त्यांचे वागणे होते. माझ्यासोबत जो माणूस होता तो सतत फोनवर कुणाशी तरी बोलत होता.तो कुणालातरी सतत आमच्या ठाव ठिकाण्याचे तपशील कोणत्या तरी वेगळ्याच भाषेत देत होता." असे त्या ट्रकच्या ड्रायव्हरने डेली मेल ला संगितले.

 

ईस्टर च्या हल्ल्यानंतर त्या ड्रायव्हरला आपण ९ एप्रिल ला जे भाडं घेतलं होतं त्याची आठवण झाली. त्याला साऱ्या घटना आठवल्या. त्याला त्यात काहीतरी काळंबेरं वाटलं. त्या दिवशीच्या माणसाचा आणि दहशतवाद्यांचा काही संबंध असेल का अशी त्याला शंका येऊ लागली. २५ एप्रिल रोजी आपल्या घरच्यांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

 

त्याच्या सांगण्यावरून २६ एप्रिलला सुरक्षा दलांनी सम्मानथुराई येथील गोदामावर छापा घालून सगळी स्फोटके जप्त केली. परंतु ते तिथे पोचण्याच्या काही मिनिटे आधी या आत्मघातकी बॉम्बर्सनी सहा मुले आणि १० नागरिकांना ठार केले होते.

 

"मला पोलिसांनी सांगितले की मी हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. पण मला प्रशंसेव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. मला आता घराच्या बाहेर जायला भीती वाटते. मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटते. मला जो पर्यंत सुरक्षित वाटत नाही आणि मी माझे काम करू शकत नाही तोपर्यंत सरकारने मला जर काही आर्थिक मदत केली तर त्यांचे माझ्यावर उपकार होतील. " असे उद्गार त्या अनामिक ड्रायव्हरने काढले.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : swarajya

 

Post Easter Bombings, India Alerted Sri Lanka Of More Strikes; Here’s How Plan To Attack Buddhist Temples Was Foiled