पाकिस्तानकडे लपविण्यासारख्या पुष्कळ गोष्टी.
         Date: 09-Mar-2019

पाकिस्तानकडे लपविण्यासारख्या पुष्कळ गोष्टी.

 

पत्रकारांना बॉम्बहल्ला झालेल्या स्थळी जाण्यापासून अडविण्यात आले कारण पाकिस्तानकडे जगापासून लपविण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत असे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले आहे.

 

२६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताने जो एअरस्ट्राईक केला त्या स्थळानजीकच्या एका शाळेत जाऊन तपासणी करण्यासाठी राऊटर्सच्या पत्रकारांना वारंवार नाकारण्यात आल्याने पाकिस्तानकडे भारतापासून लपविण्यासारखे बरेच आहे असा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला आहे.

 

शनिवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी हा दावा केला. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद कडून चालविण्यात येणाऱ्या एका धार्मिक शाळेच्या म्हणजेच एका मदरशाजवळील एका टेकडीवर राऊटर्सच्या पत्रकारांनी या नऊ दिवसात तिसऱ्यांदा जायचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षेचे कारण पुढे करून तिथे पोहोचू शकणाऱ्या सर्व वाटांवर पाकिस्तानने आपले सुरक्षा रक्षक नेमले आहेत. त्यांनी हे सर्व रस्ते अडविले आहेत.

 

 

कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,"पाकिस्तान या जागेवर जाण्यापासून पत्रकारांना अडवीत आहे याचा अर्थ या जागेवर लपविण्यासारखे पुष्कळ आहे. म्हणजेच या स्ट्राईकने यशस्वीरीत्या आपले इप्सित साध्य केले आहे असाच अर्थ होतो." 

 

२६ फेब्रुवारीला भारताच्या लढाऊ विमानांनी सीमापार जाऊन  जैश-ए-मोहम्मदच्या "दहशतवादी तळांना" उध्वस्त केल्याचे नवी दिल्लीने जेव्हापासून जाहीर केले आहे तेव्हापासून अण्वस्त्रे बाळगणाऱ्या या दोन्ही देशांमधील संबंध भयंकर तणावाचे झाले आहेत. या दहशतवादी गटाने काश्मीरमध्ये फेब्रुवारीच्या मध्यात पॅरामिलिटरीच्या सैनिकांवर आत्मघातकी हल्ला करून जवळपास ४२ जवानांना मारले होते.

 

भारताने याचा अगदी पुरेपूर बदला घेतला आहे. या हल्ल्यात "खूप मोठ्या प्रमाणात"  जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी अत्यंत अभिमानाने केला आहे. तथापि पाकिस्तानने याला दुजोरा दिलेला नाही आणि जखमींची संख्याही कळू दिली नाहीये. त्याऐवजी, भारताने जिहादी प्रशिक्षण शिबिराऐवजी एक पाईनचे जंगल नष्ट करून "पर्यावरणीय दहशतवाद"  केल्याचा भारतावर आरोप केला आहे.

 

त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हवाई चकमक उडाल्यानंतर तणाव वाढला. या चकमकीत पाकिस्तानचे एक जेट विमान कोसळविल्याचे आणि त्याबरोबरच भारताने आपले सुद्धा एक विमान गमावले असल्याचे भारताने म्हटले आहे. इस्लामाबादने मात्र त्यांचे जेट फायटर गमावल्याचे नाकारले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: RT

 

Pakistan has ‘plenty to hide’ as journalists prevented from searching bombsite – Indian official